असोला – नितेशचा पुन्हा शाळेकडे प्रवास
असोला – नितेशचा पुन्हा शाळेकडे प्रवास

असोला – नितेशचा पुन्हा शाळेकडे प्रवास

– प्राची बोरेकर

नितेश हा वर्गातील चंचल, हुशार आणि अभ्यासू विद्यार्थी आहे. तो पहिल्या वर्गात शिकतो. वर्गात तो नेहमी जे काही शिकवल्या जाते ते ऐकतो, काही समजले नाही तर प्रश्न विचारतो आणि दिलेला अभ्यास करतो. पण आता बऱ्याच दिवसापासून तो शाळेत नाही येत आहे. मी मुलांजवळ चौकशी केली पण खर कारण नेमकं काय आहे हे कळलं नाही. त्यामुळे तो शाळेत येत नसल्याने मला काळजी वाटू लागली. गेल्या दोन दिवसांपासून मी शाळेत जातांनी त्याला रोज आवाज देत होते. आणि त्याची चौकशी करत होते. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती त्यांच्या शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे आज मी स्वतः त्याच्या घरी जाण्याचा विचार केला. त्याच्या घरी गेल्यावर मी त्याच्याशी आणि त्याच्या पालकांशी संवाद साधला. नितेश सुरुवातीला काहीच बोलत नव्हता. तो थोडा संकोचलेला दिसत होता. शाळेत न येण्यामागचं कारणनही तो सांगत नव्हता. शाळेत येण्याबाबत त्याने थोडी हट्टाची भूमिका घेतली होती आणि तो येण्यास तयार नव्हता.

मी त्याला शांतपणे समजावून सांगितले की, शाळा ही फक्त अभ्यासाची जागा नसून मित्रांसोबत खेळणे, गप्पागोष्टी करणे. नवीन गोष्टी शिकणे आणि समोर मोठ होऊन काहीतरी वेगळ करून दाखवण्याची संधी आपल्यालाला इथे मिळते. मी त्याला त्याच्या मित्रांची आठवण करून दिली, वर्गात होणाऱ्या मजेदार उपक्रमांविषयी सांगितले आणि तो वर्गात किती छान सहभाग घेतो याची जाणीव करून दिली.

माझा समजावण्याचा त्याच्यावर खूप सकारात्मक परिणाम झाला. हळूहळू तो बोलायला लागला. त्याच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आत्मविश्वास दिसू लागला. तो म्हणाला, “रुको मॅडम मै अभी स्कूल के कपडे पहेनकर आता हू”। काही वेळातच त्याने शाळेची तयारी केली आणि माझ्यासोबत शाळेत यायला तयार झाला. शाळेत येताना तो आनंदाने म्हणाला, “मॅडम, मै अभी रोज स्कूल आऊंगा और अच्छे से पढाई करूंगा” हे ऐकून मला खूप छान वाटत होते. समाधान वाटत होते.

शाळेत आल्यानंतर सुरुवातीला तो थोडासा घाबरलेला होता. तो थोडा रडलाही; पण मी त्याला समजावले त्याचे काही मित्र पण माझ्यासोबत त्याला समजावत होते. काही वेळात आम्ही बालगीत म्हणायला सुरुवात केली. तो आनंदाने वर्गात सहभागी झाला आणि नेहमीप्रमाणे उपक्रमांमध्ये भाग घेऊ लागला.

हा अनुभव माझ्यासाठी खूप खास आणि प्रेरणादायी होता. विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केल्यास त्यांच्या मनात शाळेबद्दल आपुलकी निर्माण होते आणि त्यांच्या शिक्षणप्रवासात सकारात्मक बदल घडवता येतो, याची जाणीव या प्रसंगातून झाली. अशा प्रत्येक छोट्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो, हा माझा विश्वास अधिक दृढ झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *