– कुणाल माहुरकर

गेल्या ५–६ वर्षांच्या प्रवासात भरवाड समाजात शिक्षणाबद्दल एक सकारात्मक बदल दिसू लागला आहे. पालकांच्या मनात आता एक नवीन विचार रुजू लागला आहे — “आपली मुलं शिकली पाहिजेत, त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे.”
मात्र, चांगलं शिक्षण म्हणजे केवळ नोकरी मिळवणे नाही, तर स्वतःच्या आयुष्याला योग्य दिशा देणे, आत्मविश्वास वाढवणे आणि नवीन संधी निर्माण करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. स्थलांतरित जीवनशैलीमुळे शिक्षणाची सातत्यपूर्ण वाटचाल अनेकदा कठीण होत असली, तरी मुलांच्या शिक्षणाबद्दलची इच्छा आता पालकांमध्ये निर्माण होत आहे.
काही काळापूर्वी विजयने शाळा सोडून JCB, ट्रॅक्टर आणि इतर वाहनं चालवायला शिकण्यास सुरुवात केली. जिथे काम सुरू असेल तिथे जाऊन तो बारकाईने निरीक्षण करायचा आणि काही दिवसांतच नवीन काम शिकून घ्यायचा. त्याच्या या कौशल्याचं घरच्यांना कौतुक वाटत होतं, पण मनात एक प्रश्न कायम होता — “विजयच्या शिक्षणाचं काय?” हळूहळू विजयसोबत त्याचे लहान भाऊ आणि इतर काही मुलंही शिक्षणापासून दूर जाऊ लागली.
दरम्यान, भरवाड समाजातील एका मुलाने निवासी शाळेत राहून दहावीमध्ये चांगले गुण मिळवले. त्याचा परिणाम असा झाला की, काही पालकांनी आपल्या मुलांनाही शिक्षणासाठी निवासी शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र, शिक्षणापासून बराच काळ दूर राहिल्यामुळे मुलांना वयानुसार अपेक्षित शैक्षणिक पातळी गाठता आली नव्हती आणि सुरुवातीला त्यांचा प्रवेश नाकारण्यात आला. ही गोष्ट माझ्यापर्यंत आल्यानंतर मी शाळेतील शिक्षकांशी चर्चा केली आणि त्यांना सांगितले की, “ही मुलं शिक्षणापासून दूर गेली आहेत, पण त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची संधी मिळाली पाहिजे. योग्य वातावरण मिळालं तर ही मुलं नक्की पुढे जाऊ शकतात.”
यानंतर जवळपास महिनाभर शाळेशी सतत संवाद सुरू होता. अखेर तो आनंदाचा क्षण आला, जेव्हा शाळेतून फोन आला — “जर मुलांना खरंच शिकायचं असेल, तर आम्ही त्यांना एक संधी देतो.” पालकांनीही उत्साहाने पुढाकार घेत मुलांसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्याची तयारी केली. आणि आज विजय, महेश आणि राहुल या तिघांचा निवासी शाळेत प्रवेश झाला.
विजय आणि राहुल यांना निवासी शाळेत सोडण्याचा क्षण खूप भावूक करणारा होता. नवीन आयुष्याची सुरुवात करताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. काही क्षण ते आपल्या घरापासून, कुटुंबापासून दूर जाण्याच्या भावनेने भारावून गेले. पण थोड्याच वेळात त्यांनी स्वतःला सावरलं आणि नव्या स्वप्नांसह पुढे जाण्याचं धैर्य दाखवलं. आजचा दिवस फक्त तीन मुलांच्या प्रवेशाचा नव्हता, तर भरवाड समाजातील शिक्षणाच्या प्रवासातील एका नवीन आशेची सुरुवात होती.