संकलन आणि संपादन – निकिता देवासे
असोला – मुलांनी बनवलेलं जग
सुषमा महारवाडे

असोला बेड्यावर दोन वेगवेगळे समुदाय आहेत. भरवाड आणि पारधी. हे दोन्ही समुदाय त्यांच्या खास परंपरांमुळे आणि राहणीमानामुळे ओळखले जातात.
दोन्ही समुदायांचे जीवन जगण्याचे वेगवेगळे अंदाज आहेत, आणि ते दोन्हीही समाज एकमेकांपासून लांब होते. अनेक वर्षे, या दोन्ही समुदायांच्या मुलांमध्ये एकमेकांपासून दूर राहण्याचा अनुभव होता. ते एकत्र खेळत नव्हते, एकत्र शिकत नव्हते, आणि त्यामुळे त्यांच्या दरम्यान भांडणे होऊ लागले होते, ज्यामुळे त्यांच्या मधील दूरी अधिकच वाढली. भरवाड समुदायाच्या मुलांना पारधी मुलांच्या स्वच्छतेबाबत संकोच होता, ज्यामुळे ते एकमेकांशी घुलमिळू शकत नव्हते.
ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही एक महत्त्वाचा पाऊल उचलला. आम्ही वर्गात असे काही उपक्रम आणि अॅ क्टिविटी करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे मुलं एकत्र येतील, खेळतील, आणि एकत्र शिकतील. आम्ही सामूहिक खेळ आणि संवाद निर्माण करणाऱ्या वेगवेगळे उपक्रम घेण्यात सुरुवात केली, तसेच प्रार्थनेच्या वेळी दोन भरवाड मुलांच्या मध्ये एक पारधी समुदायाच्या मुलाला बसवण्याचा प्रयत्न केला. यामुळे मुलांना एकमेकांशी बोलण्याची आणि मदत करण्याची संधी मिळाली. वेळ जसजसा जात गेला, त्याच्या सकारात्मक परिणामांची सुरूवात झाली.
सुरुवातीला, भरवाड समुदायाच्या मुलांना पारधी बेड्यावर जाण्याची भीती वाटत होती, पण हळूहळू त्यांच्यात मैत्री निर्माण होऊ लागली. हे पाहून खूप आनंद झाला की आता भरवाड समुदायाची ज्योती, जेव्हा एकटी असते, किव्वा मग सुट्टीचा दिवस असतो तेव्हा ती पारधी समुदायाच्या सुहानीच्या घरी खेळायला जाऊ लागली. जे मुलं आधी सोबत बसण्यासाठीही तयार नव्हते, ते आता एकमेकांचा हात धरून खेळतात, आणि सोबत गप्पा-गोष्टी करतात. या बदलामुळे फक्त मुलांच्या दरम्यान एक नवीन मैत्रीच वातावरण निर्माण झाली नाही, तर दोन्ही समुदायांमध्ये आपसी समज आणि सहकार्याची भावना देखील वाढली. आता, वेळोवेळी दोन्ही समुदाय एकत्र येऊन बरेचसे सण साजरे करतात आणि एकमेकांची मदत देखील करतात.
हा बदल आपल्यासाठी एक शिकवण आहे की, मतभेद असतानाही, जेव्हा आपण एकत्र येऊन काम करतो, तेव्हा एक नवीन मित्रता आणि सहकार्याचा मार्ग सुरू होतो.
चक्रीघाट – एकटीचा प्रवास
पल्लवी दोडके

चक्रीघाट बेडा दिवाळीनंतर स्थलांतरित होतो. मात्र हे स्थलांतर एकत्रित न होता, वेगवेगळ्या दिशेने होते. त्यामुळे संपूर्ण समुदाय वेगवेगळ्या भागांमध्ये विभागला जातो. या विखुरलेल्या बेड्यांपर्यंत पोहोचणे आमच्यासाठी एक मोठे आव्हान ठरते.
आम्हाला त्या समुदायातल्या मुलांपर्यंत पोहोचणे, त्यांना शिक्षणाशी जोडून ठेवणे, त्यांच्या प्रगतीचा मागोवा घेणं. वर्षभर आमचं काम त्या भागात होतं. साधारण वेळी, जिथे जास्त मुले असते , तिथे मी आणि माझी को-फेलो कोमल दोघी मिळून जायचो. मात्र, त्या ठिकाणांचा अचूक पत्ता आम्हाला सुरुवातीला माहीत नसायचा. आम्ही त्यांच्या दुधाच्या गाडीत बसून, कधी रस्त्यांनी, कधी मळ्यांतून चालत, त्यांच्यापर्यंत पोहोचायचो.
पण वर्षाच्या अखेरीस एक वेगळेच आव्हान उभे राहिले, ते म्हणजे अशा प्रकारे विखुरलेल्या मुलांची एंडलाइन चाचणी घेणे .एंडलाइन म्हणजे मुलांच्या वर्षभराच्या प्रगतीचं अंतिम मूल्यमापन. आधी जिथे जास्त मुले आहे त्याच बेड्यावर आम्ही जात असायचो, पण यावेळी आम्हाला प्रत्येक बेड्यावर जावं लागणार होतं. जरी एखाद्या बेड्यावर एकच मुलगा असला तरी तिथे जाऊन त्याची एंडलाइन घेणं आवश्यक होत. पण अडचण अशी की, वेळ मर्यादित होता आणि मुलं वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेली होती. एकाच ठिकाणी दोघी जाऊन वेळ वाया घालवणे योग्य वाटत नव्हते. म्हणून आम्ही निर्णय घेतला की यावेळी आम्ही वेगवेगळ्या दिशांनी, स्वतंत्रपणे जाऊ. माझी को-फेलो एका बेड्यावर गेली आणि मी दुसऱ्या दिशेने निघाले.
एकटी जाणं हा माझ्यासाठी पहिलाच अनुभव होता. मनात हजारो विचार होते मी एकटी कसे जायचं? रस्ता सापडेल का? सुरक्षित वाटेल का? लोक कसे असतील? काही अडचण आली तर काय करायचं? पण एक क्षण असा आला की हे सर्व प्रश्न बाजूला ठेवून, फक्त एक विचार मनात ठसला,
“आपल्याला मुलांसाठी जायचं आहे.” आणि मग मी निघाले. रस्ता अनोळखी होता, पण वाटेत येणार प्रतेक चेहरा ओळखीचा वाटत होता. आणि मी बेड्यावर पोहोचले, जेव्हा मी त्या एका मुलाला भेटले, त्याच्याशी संवाद साधला. अॅक्टिविटी घेतल्या, आणि छान गप्पा मारल्या. तेव्हा जाणवलं की माझ्या एकटेपणा आणि भीती नाहीसी झाली होती. मी आता त्या समुदायाचा भाग वाटत होते.
ठणठण – असोला जायच कसं?
– पल्लवी शंभरकर

जेव्हा मुलांना असोला अभिव्यक्ती मेळाव्याबद्दल सांगितले गेले, तेव्हा ते खूप उत्साहित झाले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच मुले विचारू लागली, “दीदी, कब जाना है? वहा क्या होगा?” त्यांच्या डोळ्यांतील चमक संपूर्ण वातावरण आनंदमय करत होती.
यानंतर आम्ही हेही ठरवलं की मुलांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांनाही माहिती द्यावी. आम्ही त्यांना सांगितले की आपण १६ तारखेला असोला जाणार आहोत. जेव्हा आम्ही घरोघरी भेट दिली, तेव्हा दीदी आणि भैया लोकही खूप उत्साहित होते. आणि सगळे मुले सांस्क्रुतिक कार्यक्रम व लाठी-काठीच्या तयारीत उत्साहाने व्यस्त होती. मुली रोज डान्स सरावासाठी येत होत्या. एखादी मुलगी एखाद्या दिवशी आली नाही, तर इतर मुली तिला बोलवायला जायच्या. ही जबाबदारी त्यांनी स्वतःहून घेतली होती. तसंच मुलंही वेळेवर लाठी-काठीच्या सरावासाठी येत होते आणि एकमेकांना बोलवून आणायचे.
जिग्नेश नावाचा एक मुलगा होता ज्याला सुरुवातीला लाठी-काठी करताना अडचण येत होती. त्याची लाठी वारंवार खाली पडायची. पण तो हार मानत नसे. तो दररोज सराव करायचा आणि आता तो खूप चांगल्या प्रकारे लाठी फिरवतो. त्याच्या मेहनतीला यश मिळालं.
सुमारे एक महिन्यापासून असोला जाण्यासाठी भैयांसोबत गाडीच्या व्यवस्थेबाबत चर्चा सुरू होती. सगळे म्हणायचे, “जाना होगा क्या, और कितना व्यक्त है.” पण जेव्हा असोला जाण्यासाठी फक्त एक आठवडा उरला होता, तेव्हाही गाडीची व्यवस्था झाली नव्हती. कारण सगळ्या गाड्या चाऱ्यासाठी जात होत्या. त्यामुळे मुलांनाही काळजी वाटू लागली, “दीदी, हम कैसे जाएंगे?” मग मी समुदायाचे मुखिया सिद्धू भैयांकडे गेले आणि विचारले की गाडीचं काही ठरलं का. त्यांनी सांगितलं, “सर्वांशी बोललो, पण काही मार्ग निघाला नाही.” काही गाड्या उपलब्ध होत्या, पण चालवायला कोणीही मिळत नव्हते.
५ तारखेला सकाळी, मी पुन्हा एकदा सिद्धू भैयांकडे गेले आणि विचारले की काही गाडी मिळाली का? त्यांनी सांगितलं की प्रयत्न केला पण काही ठरलं नाही. माझ्याकडे आधीपासूनच एका गाडीवाल्याचा नंबर होता. मी लगेच त्याला फोन केला आणि संपूर्ण परिस्थिती समजावून सांगितली. त्याने मदतीसाठी होकार दिला. जेव्हा मी ही बातमी मुलांना सांगितली की गाडी मिळाली आहे, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ते उड्या मारत होते, आनंदाने ओरडत होते, “दीदी, हम चलेंगे!” !”
राहुल – गणिताचा प्रवास : भीतीकडून आत्मविश्वासाकडे
सोनखांब – प्रीतम नेहारे

राहुल सुरुवातीला जेव्हा बेड्यावर आला तेव्हा त्याला शिकण्यात काहीच रस नव्हता. पण हळूहळू त्याच्यात बदल घडू लागला. सुरुवातीचे तीन महिने तो छान लिहिता वाचता शिकला.
पण एके दिवशी खेळताना अचानक त्याचा हात तुटला आणि तो शाळेत कमी यायला लागला. आणि तेव्हाच काही महिने झाले होते, जेव्हा त्याची अभ्यासात रुची निर्माण होऊ लागली होती. त्याचा अभ्यासाचा प्रवास जणू काही थांबल्यासारखा झाला.
महिने जात गेले आणि त्याच्या अभ्यासात घसरण होऊ लागली. शिकवणं माझ्यासाठी एक आव्हान बनलं होतं. पण त्याच्यात एक खास गोष्ट होती – तो थांबला असला, तरी पुन्हा चालायला सुरुवात केली. राहुल पुन्हा रोज शाळेत यायला लागला आणि तिथूनच त्याची खरी तयारी सुरू झाली. त्याला सगळं काही परत शिकावं लागणार होतं.
तो नेहमी म्हणायचा, “मला येत नाही.” त्याचा मोठा भाऊ सुरेश त्याला अभ्यास करताना बघायचा, तेव्हा त्यालाही वाटायचं, “मलाही यायला हवं.” राहुल नेहमी म्हणायचा, “मला शिकायचं आहे, पण समजत नाही. कोणी मदतही करत नाही.” तेव्हा मी त्याला सांगितलं, “कधीही तुला वाटलं की काही समजत नाही, तर तू नक्की माझ्याकडे ये.”
एक खास गोष्ट म्हणजे राहुलला गणित थोडं कठीण वाटायचं. सुरुवातीला तर त्याला आकडेमोड पण येत नव्हती. पण हळूहळू त्याने पहाडे शिकायला सुरुवात केली आणि गणितात पुढे जाऊ लागला. आधी त्याने एक अंकी बेरीज-वजाबाकी शिकली. मग जेव्हा त्याला दोन अंकी उदाहरणं समजत नव्हती, तेव्हा मी त्याला सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं.
अशा प्रकारे त्याच्या अभ्यासाच्या प्रवासाला एक नवं वळण मिळालं. आधी त्याला गणित करताना खूप भीती वाटायची, पण जेव्हा तो गणिताची उदाहरणं सोडवायला लागला, तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढू लागला. तो म्हणायला लागला, “भैया, मला दोन अंकी उदाहरणं दे!” आणि नंतर म्हणाला, “आता तीन अंकी दे!” आणि मग तो तीन अंकी उदाहरणंही सहजपणे सोडवू लागला.
राहुलचा गणिताचा प्रवास सोपा नव्हता, पण त्याच्या मेहनतीमुळे आता त्याला गणितात मजा यायला लागली होती.