चक्रीघाट – चक्रीघाट : धैर्य, संघर्ष आणि आशा
– नवींता डोंगरे

चक्रीघाट बेडे स्थलांतरित झालेले आहेत. त्यांच्या जीवनस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आणि मुलांना भेटी देण्यासाठी आम्ही migration visit साठी निघालो. चक्रीघाट बेडा गावापासून खूप दूर, दाट जंगलामध्ये स्थलांतरित झाल्यामुळे तिथे पोहोचणे आमच्यासाठी सोपे नव्हते. आम्ही दुपारी प्रवासाला सुरुवात केली. प्रवासात अनेक अडचणीनी आल्या. त्यांना सामोरे जात अखेर रात्री आठ वाजता आम्ही तिथे पोहोचलो.
रस्त्यातील प्रवास खूप भीतीदायक होता. जंगलातील अंधार, शांतता आणि अधूनमधून दिसणारे प्राणी यामुळे भीती जरा जास्तच वाटत होती. एका ठिकाणी तर आमच्या गाडीसमोर अचानक जंगली डुक्कर आला आणि काही वेळ तो रस्ता सोडायलाच तयार नव्हता. त्या वेळी मनात भीती वाढत चालली होती. थोड्या वेळाने त्या डुक्करणे रस्ता सोडला आणि आम्ही सुरक्षितपणे पुढे निघालो. बेड्याचा रस्ता शोधताना बराच वेळ गेला, कारण बेडा मुख्य गावापासून सुमारे पंधरा किलोमीटर आत जंगलामध्ये होता. शेवटी आम्ही तिथे पोहोचलो, पण उशीर झाल्यामुळे फारस्या लोकांना भेटू शकलो नाही. त्यामुळे आम्ही रात्री बेड्यावरच थांबण्याचा विचार केला.
मध्यरात्री अचानक गायी उठून उभ्या राहिल्यामुळे जवळ एखादा प्राणी आला असावा असा भास झाला. काही वेळ खूप तणाव वाटत होता. पण नंतर सर्व काही शांत झाले. सकाळ होताच आम्ही प्रत्येक घरी भेट देत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. मुलांना worksheet दिल्या. त्या वेळी जसू दीदी त्यांच्या आयुष्यातील कठीण परिस्थिति सांगत होत्या. गायी-वासरांसह सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरावे लागते , थांबण्यासाठी जागा मिळत नाही, पाण्याची सोय बघावी लागते, अशा अनेक संकटांना त्यांना रोज सामोरे जावे लागते. कधी कधी दिवसभर भटकंती करूनही राहण्यासाठी जागा मिळत नाही आणि शेवटी शेताच्या कडेला किंवा रस्त्याच्या बाजूला थांबावे लागते. तरीही त्या धैर्याने प्रत्येक परिस्थितीचा सामना करत राहतात.
याच भेटीदरम्यान मला तेजलची आई भेटली. नुकतेच दीड महिन्याचं बाळ झालेलं असताना एवढ्या कठीण परिस्थितीत सतत प्रवास करणे तिच्यासाठी अत्यंत अवघड होते. स्वतःचा थकवा, बाळाची काळजी, घरची जबाबदारी, इतर मुलांची देखभाल आणि गायींची कामे हे सर्व ती शांतपणे सांभाळत होती. तिचा संघर्ष पाहून मन अक्षरशः हेलावून गेले. हे सगळ ऐकून आम्हाला रस्त्यात आलेली अडचणी खूप कमी वाटत होती.
मात्र मुलांना भेटल्यावर वातावरणात वेगळाच उत्साह जाणवला. ते आपल्या अनुभवांबद्दल आनंदाने बोलत होते जंगलातील प्राणी पाहणे, नवीन ठिकाणी जाणे, सतत बदलणारे आयुष्य अनुभवणे… या सगळ्यातूनही ते आनंद शोधत होते. कठीण परिस्थितीतही त्यांचे धैर्य आणि जगण्याची जिद्द खरोखर प्रेरणादायी होती.
हा संपूर्ण अनुभव आमच्यासाठी अत्यंत वेगळा, भावनिक आणि विचार करायला लावणारा होता. जंगलाच्या आत, मूलभूत सोयी-सुविधांपासून दूर राहूनही बेड्या -वरील लोक आशा, धैर्य आणि जिद्दीच्या बळावर जीवन जगत आहेत हे प्रत्यक्ष पाहणे हीच आमच्यासाठी मोठी शिकवण होती. त्यांच्या संघर्षाने मनाला स्पर्श केला आणि समाजातील अशा दुर्लक्षित जीवनाकडे अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची जाणीव करून दिली.