फोटो बुलेटिन मार्च २०२६
फोटो बुलेटिन मार्च २०२६

फोटो बुलेटिन मार्च २०२६

संकलन आणि संपादन – निकिता देवासे

सोनखांब – मयूर, धुळी आणि जानवी यांची वाढती प्रगती

– प्रीतम नेहरे

शिक्षणाच्या प्रवासात प्रत्येक मुलाची गती वेगळी असते. काही मुलांना गोष्टी लवकर समजतात, तर काहींना थोडा वेळ लागतो.

मात्र योग्य वेळ, सातत्य आणि मार्गदर्शन मिळाल्यास प्रत्येक मुलामध्ये सकारात्मक बदल घडू शकतो.

मयूरला मागील वर्षापासून मात्रा आणि अक्षरांचा अभ्यास करणे जड जात होते. मयूर खूप चंचल असल्यामुळे त्याला एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे आणि अभ्यास समजून घेण्यात कठीण जात होते. पालक आणि शाळेतील शिक्षक त्याच्याशी सतत संवाद साधत होते, परंतु त्याचा अपेक्षित परिणाम होत नव्हता. तरीही, तो दिलेला अभ्यास प्रामाणिकपणे करत होता; फक्त त्याला समजायला थोडा अधिक वेळ लागत होता. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि मार्गदर्शनामुळे आता परिस्थितीत सकारात्मक बदल दिसून येत आहे. मयूर आता मात्रा वाचन करू लागला आहे आणि त्याला गणितातील मूलभूत संकल्पना देखील समजू लागल्या आहेत.

धुळी ज्या पद्धतीने शिकत आहे, त्याचप्रमाणे तिचा विकासही होत आहे. सुरुवातीला तिला काही गोष्टी समजायला वेळ लागत होता, पण आता तिचा आत्मविश्वास वाढतांना दिसतो. सध्या तिला मात्रा वाचन चांगल्या प्रकारे करता येते. गणितातही ती बेरीज आणि वजाबाकी अचूकपणे सोडवू शकते. तिच्या शिकण्यात झालेला हा बदल तिच्या मेहनतीचा आणि नियमित सरावाचा परिणाम आहे.

जानवीला सुरुवातीला लिहिता येत नव्हते आणि अक्षर ओळखही मर्यादित होती. यामुळे तिच्यासाठी शिकणं अधिक कठीण होत होतं. मात्र, सराव आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे आता तिच्यात लक्षणीय बदल झाला आहे. तिला अक्षरांची आणि अंकांची ओळख झाली आहे आणि ती शब्द आणि पाढे वाचू शकते. तिची प्रगती मागील तुलनेत खूप वाढली आहे. आज तिचे वडीलसुद्धा आनंदाने सांगतात की ती आता स्वतः लिहू लागली आहे ही तिच्या प्रगतीची मोठी खूण आहे.

Read more

ठणठण – Zero Gravity – आनंदाचा प्रवास

– मयूर गेडाम

भरवाड समुदायातील मुलांसाठी घरच्या कामांना सोडून बाहेर जाणं हे थोडी कठीण गोष्ट आहे.

त्यामुळे मुलांना घराबाहेर पडण्याच्या आणि नवीन ठिकाणी जाण्याच्या संधी खूप कमी मिळते. त्यांच्या आयुष्यातील बहुतांश वेळ हा कुटुंबासोबतच, आपल्या ओळखीच्या परिसरातच जातो.

मुलांशी संवाद साधताना अनेक वेळा जाणवते की त्यांच्या स्वप्नांनाही मर्यादा आहेत, कारण त्यांनी अजून मोठं जग पाहिलेलंच नाही. जर त्यांना एकदा तरी अशा वेगळ्या वातावरणाचा अनुभव मिळाला, तर त्यांच्या विचारांमध्ये नक्कीच बदल होईल, असा माझा विश्वास होता.

Zero Gravity या उपक्रमाबद्दल समजल्यावर मी ठरवलं की आपल्या मुलांना तिथे घेऊन जायचंच. हा निर्णय घेताना उत्साह होता, पण त्याचबरोबर अनेक जबाबदाऱ्या आणि आव्हानंही होती. सर्वात मोठं आव्हान होतं पालकांना तयार करणं. कारण इथे रात्रीला जायचे होते.

मी एक-एक पालकांशी संवाद साधायला सुरुवात केली. काही पालकांच्या मनात भीती होती “मुलं इतक्या लांब कशी जातील?”, “त्यांची काळजी कोण घेणार?”, “काही अडचण आली तर?” अशा अनेक प्रश्नांनी ते चिंतेत होते. सुरुवातीला काही पालकांनी स्पष्ट नकार दिला. पण मी त्यांना शांतपणे समजावलं, त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना आश्वासन दिलं की त्यांच्या मुलांची पूर्ण जबाबदारी आम्ही घेऊ.

दोन चारदा त्यांच्याशी बोलल्यावर हळूहळू त्यांच्या मनातील भीती कमी होऊ लागली आणि विश्वास वाढू लागला. काही पालकांनी होकार दिला आणि तिथूनच या प्रवासाची सुरुवात झाली.

प्रवासाच्या दिवशी मुलांमध्ये एक वेगळीच उत्सुकता दिसत होती. काही मुलं पहिल्यांदाच इतक्या लांब जात होती, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाबरोबरच थोडीशी भीतीही होती. पण तरीही ते खूप उत्साही होते. प्रवासादरम्यान ते सतत नवीन गोष्टी पाहत होते, प्रश्न विचारत होते आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेत होते.

जेव्हा मुलं Zero Gravity मध्ये पोहोचली, आजूबाजूचं वातावरण, विविध activities, खेळ हे सगळं त्यांच्यासाठी अगदी नवीन होतं. सुरुवातीला काही मुलं थोडी घाबरलेली होती, पण हळूहळू त्यांनी स्वतःला त्या वातावरणाशी जुळवून घेतलं.

थोड्याच वेळात त्यांनी भीती विसरून मनापासून खेळायला आणि हसायला सुरुवात केली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांचं हसणं हे सगळं पाहताना असं वाटत होतं की हा अनुभव त्यांच्या आयुष्यातील एक खास क्षण बनत आहे.

त्या दिवशी त्यांनी फक्त खेळ आणि activities केल्या नाहीत, तर त्यांनी एक वेगळीच दुनिया अनुभवली जी त्यांच्या नेहमीच्या आयुष्यापेक्षा खूप वेगळी होती.

त्या दिवसाने मला एक महत्त्वाची गोष्ट शिकवली मुलांना स्वप्न पाहायला संधी दिली पाहिजे. आणि त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कोणीतरी त्यांच्यासोबत उभं राहणं खूप गरजेचं आहे. योग्य संधी आणि थोडीशी साथ मिळाली, तर हीच मुलं मोठी स्वप्नं पाहू शकतात आणि ती पूर्णही करू शकतात.

Read more

असोला – मुलांसोबतचे सुंदर क्षण

– प्राची बोरेकर

आज आम्ही मायग्रेशन बेड्यांवर मुलांना भेटायला गेलो होतो. खूप दिवसांनी त्यांना भेटायची आणि पाहायची संधी मिळाली, त्यामुळे मनात एक वेगळीच उत्सुकता आणि आनंद होता.

रस्ता नीट माहीत नव्हता, तरीही कोणाला विचारत, शोधत आम्ही शेवटी आमच्या मुलांपर्यंत पोहोचलो. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा तो प्रवासही खूप खास वाटत होता, कारण प्रत्येक पावलागणिक त्यांना भेटायची ओढ वाढत होती.

आम्हाला पाहून सुरुवातीला मुलं थोडी लाजत होती, थोडी दूरच उभी राहून आमच्याकडे बघत होती. जणू त्यांना अजून खात्रीच वाटत नव्हती की आपण खरोखर त्यांना भेटायला आलो आहोत. शीतल तर आधी आमच्या जवळ आलीच नाही. ती अजून खूप लहान आहे. फक्त तीन वर्षांची. तिच्या चेहऱ्यावर थोडी भीती दिसत होता. पण आम्ही तिच्याशी हळूहळू बोललो, हसलो, तिला आपल्यात घेतलं… आणि मग काही वेळातच तीही हसत हसत आमच्याकडे आली.

मग तर सगळंच वातावरण बदलून गेलं. सगळ्या मुलांनी मिळून खूप खेळलो, गप्पा मारल्या, हसलो आणि मनमुराद मजा केली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, खूप काही सांगून जात होतं. त्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये एक वेगळंच आपलेपण जाणवत होतं. जणू काही आपण त्यांच्यापासून कधी दूरच नव्हतो.

आम्ही त्यांना भेटून जितके आनंदी झालो, तितकेच तेही आम्हाला पाहून खुश झाले होते. त्यांच्या त्या निरागस आनंदाने आमचं मन पूर्णपणे भरून आलं. त्या क्षणांमध्ये वेळ कसा गेला हेच कळलं नाही. पण परत येण्याची वेळ आली तेव्हा मात्र मन तयारच होत नव्हतं. असं वाटत होतं की अजून थोडा वेळ तिथेच थांबावं, अजून थोडं खेळावं, अजून थोडं बोलावं… कारण तो वेळ खूप मौल्यवान वाटत होता.

आजच्या त्या भेटीतून एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळाली कधी कधी कोणाला मोठ्या गोष्टींची गरज नसते. फक्त थोडा वेळ, थोडं लक्ष आणि थोडं प्रेम दिलं तरी त्यातून खूप मोठा आनंद निर्माण होतो.

Read more

चक्रीघाट – अंगठ्यापासून सहीपर्यंत

– नविनता डोंगरे

आज आम्ही नेहमीप्रमाणे गावाबाहेर भरवाड बेड्यावर गेले होतो. सूर्य खूप तापत होता. सगळीकडे उकाडा जाणवत होता आणि मोकळ्या जागेत बसणं कठीण झालं होतं.

त्यामुळे आम्ही मुलांचा क्लास घेण्यासाठी सावली शोधत होतो. बराच वेळ शोधल्यानंतर एका मोठ्या झाडाखाली थोडासा गारवा मिळाला आणि तिथेच आम्ही मुलांना शिकवायला सुरुवात केली.

इतक्यात तिथे एक पोस्टमॅन काका आले. त्याच्या हातात एक पार्सल होतं एका मुलाच्या वडिलांसाठी औषध आलेलं होतं. पोस्टमॅन म्हणाला,“यावर सही करायला कोण आहे?”

सगळे मोठे लोक एकमेकांकडे बघू लागले. नेहमीसारखंच अंगठा लावायची सवय होती.

पण यावेळी काहीतरी वेगळं घडलं.

सवा मुलगा हळूच उठला.
त्याने पोस्टमॅनकडून पेन घेतलं… थोडा वेळ कागदाकडे बघितलं… आणि मग त्याने स्वतःचं नाव लिहिलं.

थोडं वाकडं-तिकडं होतं… पण ती त्याची पहिली सही होती.

त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद होता, तो शब्दांत सांगता येणार नाही. त्याच्या डोळ्यांत आत्मविश्वास दिसत होता “मीही करू शकतो” हा विश्वास.

आजूबाजूला बसलेल्या सगळ्यांच्या डोळ्यांत अभिमान दिसत होता. त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावरही एक वेगळीच समाधानाची भावना होती. त्या छोट्याशा सहीने एक छान बदल घडवला होता.

त्या छोट्याशा सहीमध्ये फक्त नाव नव्हतं, तर त्याचा आत्मविश्वास होता. अंगठ्यापासून सहीपर्यंतचा हा प्रवास फक्त एका मुलाचा नव्हता, तर शिक्षणाने कसा बदल घडू शकतो याचा जिवंत अनुभव होता.

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *