-रोहिणी कालभूत

माझं बोथली बेड्यावरील केंद्रावर काम सुरू होऊन आता एक महिना झाला आहे.
हा काळ छोटा असला तरी अनुभवांनी भरलेला आहे. रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतंय, नव्या गोष्टी समजून घेत आहे, आणि स्वतःत एक सकारात्मक बदल घडताना दिसतो आहे.
इथल्या मुलांना शाळेत जायला भीती वाटायची. शाळा त्यांच्या दृष्टीने एक भीतीचं ठिकाण होतं.
“शाळेत शिक्षक ओरडतील, शिक्षा करतील…” या भीतीमुळे मुलं शाळेकडे वळायला तयार नव्हती.
माझा खरा प्रवास इथून सुरू झाला फक्त शिकवण्याचा नाही, तर मुलांना पुन्हा शाळेच्या दिशेने वळवण्याचा. मी ठरवलं की आधी मुलांमध्ये विश्वास निर्माण करायचा. मी त्यांच्याबरोबर खेळायला लागले, गप्पा मारायला लागले, त्यांच्याच भाषेत संवाद साधायला सुरुवात केली.
ते आपले वाटायला लागले, आणि मीही त्यांच्यातलीच एक झाले.
या नंतर मी त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचलो. प्रत्येक मुलाच्या घरी जाऊन त्यांच्या आई-वडिलांशी संवाद साधला. मुलं शाळेत का येत नाहीत? यावर चर्चा केली.
आणि “प्रत्येक घरी जाऊन मुलाला घेऊन शाळेत नेण्यास सुरुवात केली.”
आणि आता बरीच मुले आनंदाने शाळेत येतात. वर्गात बसतात, ऐकतात, उत्तरं द्यायचा प्रयत्न करतात. त्यांच्या डोळ्यांत आता भीती नाही, तर आत्मविश्वास दिसायला लागला आहे.
या दिवसांमध्ये मुलांना शिकवताना मी स्वतःही खूप काही शिकले आहे.संवाद म्हणजे केवळ शब्द नव्हे, तर समजून घेणं असतं.
समजूत म्हणजे त्यांच्या जागी उभं राहून त्यांचा दृष्टिकोन समजून घेणं. ही सगळी शिकवण मला रोज नव्यानं मिळते आहे.
ते शिकतात, आणि त्यांच्यासोबतच माझाही “शिकणे” आणि “शिकवण्याचा” प्रवास सुरू आहे